शुक्रवार, १८ सप्टेंबर, २०२०

मास्क नाही - प्रवेश नाही, सामाजिक अंतर नसेल तर वितरणही नाही उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती तसेच आस्थापनास दंड; प्रसंगी आस्थापना सक्तीने बंद जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

 


 

कोल्हापूर, दि. 18 (जिल्हा माहिती कार्यालय) : व्यापारी दुकाने, खासगी व शासकीय आस्थापना, फेरीवाले, भाजी, फळे विक्रेते, कारखाने, प्रवासी वाहने याठिकाणी ‘मास्क प्रवेश नाही’ ‘सामाजिक अंतर नसेल तर वितरणही नाही’ यानुसार सर्व आस्थानामध्ये दर्शनी भागात फलक लावावा. मास्क नसल्यास प्रवेश न देण्याचे बंधनकारक करावे. तसेच सामाजिक अंतर नसेल तर सेवा किंवा वस्तुचे वितरणही करु नये. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती व आस्थापनांचे व्यवस्थापक यांच्या विरुध्द त्या-त्या सक्षम प्राधिकाऱ्यांकडून विहित दंड आकारणी करण्यात येईल व आस्थापना सक्तीने बंद करण्याचे अधिकार संबंधित स्थानिक प्रशासनास व पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात येत आहेत, असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिले.

जिल्हयातील ग्रामीण व शहरी भागामध्ये कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव होऊन रुग्ण संख्येमध्ये मोठया प्रमाणात वाढ होत आहे. कोव्हिड-19 नियंत्रण कार्यवाहीत जनतेच्या सहभागाची आवश्यकता आहे. सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर मास्क परिधान न करणे, रस्त्यावरील फळविक्रेते, भाजी विक्रेते, व्यापारी आस्थापना, दुकानदार या ठिकाणी मास्क न वापरणे, हॅण्डग्लोज न वापरणे इत्यादी कृत्य हे दंडनीय घोषित करण्यात आलेले आहे. ‘माझे कुटुंब  माझी जबाबदारी’ ही मोहीम राबविण्यात येणार आहे. व्यापारी संघटना, कारखानदार व प्रशासनाने 'मास्क नाही - प्रवेश नाही' 'सामाजिक अंतर नसेल तर वितरणही नाही ' ही मोहीम राबवावी, असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले आहेत..

कोव्हिड -19 प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून व्यापारी दुकाने, खाजगी आस्थापना, मॉल्स, कारखाने, प्रवासी वाहने, ऑटोरिक्षा इत्यादी ठिकाणी मास्क नाही - प्रवेश नाही, सामाजिक अंतर नसेल तर वितरणही नाही, ही मोहीम राबवावी.

            जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी दिलेल्या आदेशात असे नमुद आहे- व्यापारी दुकाने, खाजगी व शासकीय आस्थापना, मॉल्स, फेरीवाले, भाजी – फळे विक्रेते, कारखाने, प्रवासी वाहने, ऑटो रिक्षा इत्यादी ठिकाणी 'मास्क नाही - प्रवेश नाही' 'सामाजिक अंतर नसेल तर वितरणही नाही ' सर्व आस्थापनामध्ये दर्शनी भागामध्ये फलक लावणे व मास्क नसल्यास प्रवेश न देणेचे बंधनकारक करणे. तसेच सामाजिक अंतर नसेल तर सेवा किंवा वस्तुचे वितरणही करू नये.

            ग्राहकांनी व नागरिकांनी ही आस्थापनामध्ये, आस्थापना मालकाकडून मास्क वापरला जात नसेल, सामाजिक अंतर व सॅनिटायझेशनचे पालन केले जात नसेल तर आस्थापनामध्ये प्रवेश करू नये व आस्थापनांमधून माल घेवू नये.

            शासकीय व खासगी, व्यापारी व इतर सर्व आस्थापनामध्ये येणाऱ्या ग्राहकांकडून योग्य सामाजिक अंतर राखले जाईल, याविषयी खात्री करणे व सदरचे उल्लंघन होत असल्यास वस्तु व सेवांचे वितरणही करणेत येऊ नये.

            फेरीवाले, किरकोळ विक्रेते, फळविक्रेते, दूध विक्रेते, मटण विक्रेते या सर्वांनीही 'No Mask – No Goods', सामाजिक अंतर राखणे, वारंवार हात धुणे व सॅनिटायझेन करणे या उपायांची काटेकोर अंमलबजावणी करणे. व्यापारी दुकाने, खाजगी आस्थापना, मॉल्स, कारखाने या ठिकाणच्या परिसरामध्ये वारंवार निर्जंतुकीकरण करणे.

आदेशाचे उल्लघन करणारे व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 तरतुदीनुसार तसेच भारतीय दंड संहिता 1860 (45) च्या कलम 188 अन्वये कारवाईस पात्र राहील, असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

  

0000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.