* महा आवास
योजनेंतर्गत राज्यातील 8 लाख लाभार्थ्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण * स्थानिक
स्वराज्य संस्था ह्या राजकीय शिक्षण देऊन कार्यकर्ते व नेते घडविणाऱ्या शाळा * दरडोई
उत्पन्नात कोल्हापूर जिल्हा प्रथम येण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत * जिल्ह्यातील
सर्व ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण होण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा * कोल्हापूर
जिल्हा परिषद देशात आघाडीवर असली पाहिजे * जगाच्या
पर्यटन नकाशावर कोल्हापूर येण्यासाठी सर्वजण प्रयत्न करू या! * स्थानिक
स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा कायापालट करण्याची मोठी संधी * पुरस्कार
ही सुरवात असून यापेक्षा उत्कृष्ट काम करण्याचे आवाहन * मान्यवरांच्या
हस्ते जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य/कर्मचारी यांना दिला जाणारा राजर्षी छत्रपती शाहू पुरस्कार, आचार्य
अत्रे सर्वोत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार व महा आवास
योजना पुरस्कारांचे वितरण कोल्हापूर, दि. 1 (जिमाका):- राज्यात
महापूर व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे,
अशा कठीण परिस्थितीत राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून विकास
कामांना कात्री लावून शेतकऱ्यांना आधार दिला जाईल, असे प्रतिपादन ग्राम विकास व
कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. जिल्हा
परिषदेच्या वतीने येथील सैनिक कल्याण सभागृहात आयोजित राजर्षी छत्रपती शाहू
पुरस्कार, अचार्य अत्रे सर्वोत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार व महा आवास योजना
पुरस्कार वितरण प्रसंगी ग्रामविकास मंत्री मुश्रीफ बोलत होते. यावेळी गृह
राज्यमंत्री तथा पालकमंत्री सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील, आमदार राजीव आवळे,
आमदार जयंत आसगावकर, जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील, जिल्हाधिकारी राहुल
रेखावार, जिल्हा परिषद उपाध्यक्ष जयवंत शिंपी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी संजयसिंह चव्हाण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने,
शिक्षण व अर्थ समिती सभापती श्रीमती रसिका पाटील, सभापती बांधकाम व आरोग्य समिती
सभापती श्रीमती वंदना जाधव, महिला व बाल कल्याण
सभापती श्रीमती शिवानी भोसले, समाज कल्याण समिती सभापती श्रीमती कोमल मिसाळ,
ज्येष्ठ सदस्य अरुण इंगवले, सदस्य सतीश पाटील, युवराज पाटील व अन्य मान्यवर
उपस्थित होते. ग्राम विकास मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले
की, मागील दीड-दोन वर्षात राज्यावर मोठी संकटे आलेले आहेत. यात कोरोना या
साथीच्या आजरा बरोबरच महापूर व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले गेले
असून त्यांना आधार देण्याची गरज आहे. अशा नैसर्गिक आपत्तीच्या परिस्थितीत राज्य
शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून प्रसंगी विकास कामांचा निधी कमी करून शेतकऱ्यांना आधार देण्यात येईल, असे
त्यांनी सांगितले. राज्यातील गोरगरीबांच्या
घरकुलाचे स्वप्न पूर्ण करण्यात प्रशासनाची दिरंगाई कारणीभूत ठरत होती.
लाभार्थ्यांच्या याद्या मंजूर होते परंतु घरकुलाचा लाभ दिला जात नव्हता ही बाब
लक्षात आल्यानंतर राज्यस्तरावर महा आवास अभियान ही मोहीम राबवून 90 दिवसात आठ
लाख लाभार्थ्यांना घर देण्याचे उद्दिष्ट ठेवून ते पूर्ण करण्याचे काम करण्यात
आले. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना व
पारधी आवास योजनेतील लाभार्थ्यांचा समावेश आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी
अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्कृष्टपणे सहभाग घेतला त्या सर्वांचे ग्रामविकास
मंत्री मुश्रीफ यांनी कौतुक केले. तसेच या अभियानांतर्गत लाखो लोकांच्या घराची
स्वप्न पूर्तता अत्यंत गतिमान पद्धतीने झाल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
यांनीही या मोहिमेचे कौतुक केले होते असे त्यांनी सांगितले. ग्रामपंचायत
पंचायत समिती व जिल्हा परिषद व अन्य स्थानिक स्वराज्य संस्था या राजकीय शिक्षण
देऊन कार्यकर्ते व नेते घडवणाऱ्या शाळा असल्याची माहिती ग्राम विकास मंत्री
मुश्रीफ यांनी देऊन या माध्यमातून स्थानिक कार्यकर्ते नेते व संस्थेच्या
कर्मचाऱ्यांनी छत्रपती शाहू महाराजांचा समतेचा संदेश उराशी बाळगून पुढील काळातही
सर्वसामान्य लोकांसाठी असेच कार्य करत राहावे, असे आवाहन केले. तसेच जिल्हा
प्रशासनाने कोल्हापूर जिल्हा दरडोई उत्पन्नात देशात आघाडीवर राहील यासाठी
प्रयत्न करावेत, अशा सूचनाही त्यांनी केल्या. कोल्हापूर
जिल्हा परिषद देशात आघाडीवर असली पाहिजे -पालकमंत्री सतेज
पाटील
आज जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणारे पुरस्कार हे पुरस्कार प्राप्त
व्यक्तीसाठी एक नवीन सुरुवात असून यापुढील काळात ही अपेक्षा अधिक उत्कृष्ट काम
परस्परांच्या सहकार्याने करावे. कोल्हापूर जिल्हा परिषद ही विकासात्मक कामात
राज्यातच नव्हे तर देशात आघाडीवर असली पाहिजे यासाठी प्रत्येकाने प्रयत्न
करावेत, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी अध्यक्षस्थानावरून बोलताना केले. जिल्हा
परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत सदस्यांना या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या
माध्यमातून ग्रामीण भागाचा कायापालट करण्याची मोठी संधी असून या संधीतून त्यांनी
तळागाळातील लोकापर्यंत विकास कामे घेऊन जाऊ शकतात असे पालकमंत्री पाटील यांनी
सांगून कोल्हापूर जिल्हा परिषदेने निर्मल ग्राम व ओडीएफ मध्ये चांगले काम केले
असून पुढील काळात ही जिल्हा परिषद ओडीएफ प्लस झाली पाहिजे यासाठी प्रयत्न
करावेत, अशी सूचना श्री. पाटील यांनी केली. जिल्हा
प्रशासनाच्या वतीने पर्यटन डेस्टिनेशन कोल्हापुरचे ब्रँडिंग केले जात असून या
माध्यमातून पुढील काळात कोल्हापूर जिल्हा जगाच्या पर्यटनाच्या नकाशावर
येण्यासाठी सर्वांनी एकत्रित मिळून प्रयत्न करू या! कोरोना प्रतिबंधासाठी
लसीकरणात कोल्हापूर जिल्हा आघाडीवर असला तरी अजून पन्नास ते साठ टक्के लोकांचे
लसीकरण झालेले नाही. तसेच आजच्या ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून आपल्या
कुटुंबातील व परिसरातील ज्येष्ठ नागरिकांचे 100% लसीकरण होण्यासाठी प्रयत्न
करण्याची शपथ घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. तसेच सर्व पुरस्कारार्थीचे
त्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. कोल्हापूर
जिल्हा परिषदेने अत्यंत पारदर्शकपणे पुरस्कारार्थीची निवड केलेली आहे. जिल्हा
प्रशासन गतिमान पद्धतीने लोकाभिमुख केले जात असून गावपातळीपर्यंत प्रशासन
पोहचण्यासाठी कर्मचाऱ्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे जिल्हाधिकारी राहुल
रेखावार यांनी सांगितले. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील यांनी सर्व मान्यवरांचे
व पुरस्कार प्राप्त व्यक्ती यांचे स्वागत केले तर मुख्य कार्यकारी अधिकारी
चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून
पुरस्कार वितरण सोहळयाचा शुभारंभ झाला. तर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष जयवंत
शिंपी यांनी आभार मानले. मान्यवरांच्या
हस्ते पुरस्कार वितरण जिल्हा परिषदेच्या वतीने सन 2020-21 व
2021-22 या दोन वर्षात जिल्हा परिषद, पंचायत समिती
सदस्य/कर्मचारी यांना दिला जाणारा राजर्षी छत्रपती शाहू पुरस्कार, जिल्हा परिषद,
पंचायत समिती सदस्य/कर्मचारी यांना दिला जाणारा राजर्षी छत्रपती शाहू पुरस्कार,
जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य/कर्मचारी यांना दिला जाणारा राजर्षी छत्रपती
शाहू पुरस्कार व महा आवास योजना पुरस्कारांचे वितरण विकास मंत्री हसन मुश्रीफ व
पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा
परिषद, पंचायत समिती सदस्य/कर्मचारी यांना दिला जाणारा राजर्षी छत्रपती शाहू
पुरस्कार-
सन 2020-21- सौ. रोहिणी अर्जुन आबिटकर( पिंपळगाव तालुका भुदरगड जिल्हा परिषद
सदस्य), निवड यादी सन 2021-22 अंतर्गत 1) विशाल सुरेश महापुरे, कोडोली तालुका
पन्हाळा 2)कल्पना केरबा चौगुले येवलूज तालुका पन्हाळा 3) विजय जयसिंग भोजे,
अब्दुललाट ता शिरोळ, 4)शिवानी विजयसिंह भोसले, नानीबाई चिखली तालुका कागल 5)
शिल्पा चेतन पाटील सडोली खा तालुका करवीर 6)विनय राजेंद्र पाटील राशिवडे तालुका
राधानगरी या सर्व जिल्हा परिषद सदस्य तर पुनम राहुल मगदूम-महाडिक सिद्धनेर्ली
तालुका कागल सभापती पंचायत समिती यांना सन्मानित करण्यात आले. जिल्हा
व तालुकास्तरावर आचार्य अत्रे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार सन 2020-21 मध्ये
बारा पत्रकारांना तर 2021-22 मध्ये जिल्हास्तर एक व तालुकास्तरावरील बारा
पत्रकारांना वितरित करण्यात आले. राजर्षी छत्रपती शाहू पुरस्कार सन 2020-21
मध्ये 17 कर्मचारी तर सन 2021-22 मध्ये तेरा कर्मचाऱ्यांना देण्यात आले.
महा आवास अभियान पुरस्कार:- प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत उत्कृष्ट तालुके म्हणून
गगनबावडा, आजरा व राधानगरीचे सभापती, उपसभापती व गटविकास अधिकारी यांना पुरस्कार
देण्यात आला तर रमाई आवास योजनेअंतर्गत कागल, गगनबावडा व आजरा तालुक्याचे सभापती
उपसभापती व गटविकास अधिकारी यांना सन्मानित करण्यात आले.
तसेच प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण योजनेअंतर्गत उत्कृष्ट क्लस्टर म्हणून
सरवडे तालुका राधानगरी, सांगरूळ तालुका करवीर व उत्तुर तालुका आजरा तर रमाई आवास
योजनेअंतर्गत उत्कृष्ट क्लस्टर म्हणून करंजफेन/पनून्द्रे तालुका शाहूवाडी, निगवे
खालसा तालुका करवीर व कोडोली तालुका पन्हाळा येथील सभापती, जिल्हा परिषद सदस्य
यांना सन्मानित करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या वर्ग ड कर्मचाऱ्यांमधून वर्ग क
कर्मचाऱ्यांमध्ये पदोन्नती झाल्याबद्दल निखील मोहिते, सुभाष शामराव यादव,
प्रियांका पुंडलिक खाडे व पृथ्वीराज पांडुरंग
खोत यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान करण्यात आला. 000000 |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.