इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शुक्रवार, २९ मे, २०२०

आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज







          जिल्ह्यात गेल्या वर्षी महापुराने थैमान घातल्याने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले. शासन-प्रशासन, स्वयंसेवी-सेवाभावी संस्था आणि कोल्हापूरकरांच्या धैर्य आणि संयमी वृत्तीमुळे महापूरातूनही कोल्हापुरकर सावरल ! पण महापुरामुळे जिल्ह्याची फार मोठी हानी झाली. यंदाच्या पावसाळ्यात संभाव्य महापुराची शक्यता गृहीत धरुन प्रशासनाने आतापासूनच नियोजन केले असून पूरस्थितीचा मुकाबला करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज आणि सजग केली आहे.  

            गेल्या वर्षीच्या महापुराचा कटू अनुभव डोळयासमोर ठेऊन जिल्हा प्रशासनाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सज्ज आणि सतर्क केली आहे. महापुराचा सामना करतांना कोणतीही कमी राहू नये यावर जिल्हयाचे पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी भर दिला असून पूर बाधित गांवात पूरनियंत्रणाच्या उपाययोजनांचे सुक्ष्म नियोजन केले आहे. गेल्यावर्षीच्या महापुराचा अनुभव लक्षात घेऊन पालकमंत्री सतेज पाटील यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे मान्सूनपूर्व आढावा घेतला. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हयातील प्रत्येक तालुक्यात बोटिंची व्यवस्था करण्यात येत आहे. तसेच एनडीआरएफची 2 पथके बोटिंसह मागणी केली असून भारतीय तटरक्षक दलही बचाव व मदत कार्यासाठी  सक्रीय झाले आहे. 
जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माध्यमातून संभाव्य पूरपरिस्थितीला तोंड देण्यासाठी आवश्यक साधनसामुग्री उपलब्ध केली असून, यामध्ये इन्फ्लेटेबल रबर बोट- ओबीएम सह - 8, रबर बोट(जुन्या-नव्या)- 17, एअर पंप फॉर बोट- 6, टॉर्च सर्च लाईट- 40, लाईफ बाईज-30, सेफ्टी हेलमेट-50, मेगा फोन-21, फलोटींग पंप-7, स्कुबा डायव्हिंग सेट -2, लाईफ जॅकेट -200, लाईफ बॉय रिंग- 306, सर्च लाईट -20, हेड लाई विथ झुम – 10, फलोटींग रोप मिटर-100 , इन्फ्लेटेबल लाईफ जॅकेट -50, अंडर वॉटर सर्च लाईत-10 तसेच आस्का लाईट-18 यांचा समावेश आहे. संभाव्य महापुराला तोंड देण्यासाठी उपलब्ध करुन दिलेली साधनसामुग्री योग्य सुस्थितीत आहेत किंवा नाहीत याची खातरजमा करण्यात आली आहे. जिल्हयातील स्वयंसेवी-सेवाभावी संस्था, आपदा मित्र अशा 808 स्वयंसेवकांचा रेस्क्यू फोर्स तैनात केला आहे. गावागावात तरुणांनी फौजच उभी करण्यात येणार आहे.
गेल्या वर्षी पाऊस आणि अतिवष्टीमुळे आलेल्या महापुरामुळे जिल्हयातील 386 गावे बाधीत झाली, यामध्ये कोल्हापूर शहर, शिरोळ तालुक्यातील 42, हातकणंगले -23, करवीर-57, कागल-41, राधानगरी -22, गगनबावडा-19, पन्हाळा-47, शाहुवाडी-25,गडहिंग्लज -27, चंदगड-30,आजरा-30 आणि भुदरगड तालुकयातील -23 गांवाचा समावेश आहे. या पूरबाधित गांवामध्ये पूरनियंत्रणाच्या दृष्टीने शोध व बचाव पथके गठीत केली असून गाव ते जिल्हा पातळीवर प्रशासकीय यंत्रणा गतिमान केल्या आहेत. पूरबाधित गावातील लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्याचेही नियोजन करण्यास प्राधान्य दिले आहे. 
            जिल्ह्यातून प्रामुख्याने कृष्णा, वारणा, पंचगंगा, दुधगंगा, वेदगंगा, हिरण्यकेशी आणि घटप्रभा या नद्या वाहतात, कृष्णा नदी जिल्हयाच्या ईशान्यपूर्व सिमेवरुन तर वारणा, पंचगंगा, दुधगंगा आणि हिरण्यकेशी या नद्या वायव्येकडून आग्नेयेकडे वाहतात. वारणा नदी सांगली व कोल्हापूर जिल्हयाच्या सिमेवरुन 120 कि.मी. वाहते, जिल्हयातील कासारी, कुंभी, तुळशी आणि भोगावती या उपनद्या पंचगंगा नदीस मिळाल्या आहेत. पंचगंगा नदी नृसिंहवाडीजवळ, तर दुधगंगा नदी जिल्हा सिमेबाहेर थोडयाच अंतरावर कृष्णा नदीस मिळते. तिलारी ही एकच नदी पश्चिमवाहिनी आहे. जिल्हयात राधानगरी, तुळशी, वारणा, दुधगंगा, कासारी, कडवी, कुंभी, पाटगांव, चिकोत्रा, चित्री,जंगमहट्टी, घटप्रभा जांबरे ही धरणे आहेत, जिल्ह्यातील संभाव्य पुरपरिस्थिती नियंत्रणाच्या दृष्टीने पाटबंधारे विभागही सज्ज आणि सजग झाला आहे. धरण पाणलोट क्षेत्रात पडणारा पाऊस तसेच धरणप्रकल्पातील पाणीसाठा, विसर्ग आणि त्यानुसार नद्यीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा या सर्व गोष्टी नियोजनबध्द, शास्त्रसुध्द पध्दतीने करण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता महेश सुर्वे यांनी केले आहे. महापुरास कारणीभूत मानल्या जाणाऱ्या अलमट्टी प्रकल्पाच्या पाणीसाठा आणि विसर्गाबाबतही  बेळगाव, सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यातील प्रशासकीय पातळीवर सुयोग्य नियोजन ठेवण्यात येत आहे.
आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माध्यमातून संभाव्य पूरनियंत्रणासाठी आवश्यक पूर्वतयारी करुन पूराचा धोका असणाऱ्या गावांबरोबरच तालुका आणि जिल्हा पातळीवरही आपत्ती व्यवस्थापन गट कार्यान्वित करुन आपत्ती निवारणार्थ करावयाच्या उपाययोजनाचे प्रशिक्षणही दिले आहे. गाव पातळीवरही शोध व बचावपथके कार्यान्वित केली असून यामध्ये महसूल विभागाबरोबरच पोलीस, जिल्हा परिषद, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, महावितरण, कृषी, आरोग्य, गृहरक्षक, अग्निशमन दलाबरोबरच जिल्हयातील विविध रेस्क्यू फोर्स आणि गावातील तरुणांचा समावेश करण्यात आला आहे. पूराचा धोका असणा-या गावांमध्ये नियंत्रण कक्ष अहोरात्र सुरु केला आहे. 
जिल्हाधिकारी कार्यालयात 1 जूनपासून 24 तास आपत्ती नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात येत असून संभाव्य पूरपस्थितीचा मुकाबला करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सज्ज आहे. यासाठी नियंत्रण कक्षाचा 1077 हा टोल फ्री क्रमांक असून अन्य क्रमांक पुढील प्रमाणे आहेत. 0231-2659232 तसेच पोलीस नियंत्रण कक्षही सज्ज असून यासाठी 100 तसेच 0231-2662333 असे दुरध्वनी क्रमांक आहेत. याशिवाय पाटबंधारे विभागाने सर्व धरण प्रकल्पावर तसेच जिल्हास्तरावरही आपत्ती नियंत्रण कक्ष अहोरात्र कार्यरत ठेवण्यात आले आहेत. 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही यंदाच्या पावसाळयात करण्यात येणाऱ्या उपाययोजनामध्ये कोरोना प्रतिबंधक उपाययोजनाही करणे क्रमप्राप्त झाले आहे. महापुराच्या काळात पूरबाधित गावात बचाव व मदत कार्य गतिमान करण्याबरोबरच पूरग्रस्थांसाठी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरणाची ठिकाणे निश्चित करणे, निवारागृहांची निवड करतांना वीज,पाणी, स्वच्छतागृहे, भोजन, औषधोपचार आदि पायाभूत सुविधाची उपलब्धी महत्वाची आहे. पूरप्रतिबंधक उपायोजना राबवितांना कोरोना विषाणूचा संसर्ग होणार नाही, यादृष्टीने पूरपरिस्थितीमध्येही कोरोना प्रतिबंधक उपाय करणे महत्वाचे असून यामध्ये प्रामुख्याने सामाजिक अंतर, स्थलांतरीत लोकासाठींच्या निवारागृहामध्ये निर्जंतुकीकरणाची साधने, मास्क, सॅनिटायझर यांचीही उपलब्धता करण्यावर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी भर दिला आहे.
                                                                                   - एस.आर.माने
                                                                               - कोल्हापूर.
00

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.