शुक्रवार, १६ ऑगस्ट, २०१९

साथ प्रतिबंधात्मक उपाययोजना प्राधान्याने राबवा - आरोग्य सेवा संचालक डॉ. अर्चना पाटील




कोल्हापूर दि.16 (जिमाका)  : जिल्हयात अभूतपूर्व पूरपरस्थिती निर्माण झाली असून पूरपरस्थितीनंतर साथरोग प्रतिबंधासाठी जिल्हयातील सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वय ठेऊन साथ प्रतिबंधात्मक उपाययोजना पूरग्रस्त भागात प्राधान्याने उपलब्ध करुन द्याव्यात, अशी सूचना आरोग्य सेवा संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी केली.
      जिल्हयातील पूरपरिस्थितीमध्ये करावयाच्या स्वच्छता व आरोग्य उपाय योजनांचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी महापूर ओसरल्यानंतर साथ रोग प्रतिबंधासाठी करावयाच्या कार्यवाहीबाबत मागदर्शन केले. या प्रसंगी सहसंचालक आरोग्य सेवा  (हिवताप)  डॉ. भोई, उपसंचालक आरोग्य सेवा डॉ. बिलोलीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा शल्यचिकित्सक  डॉ. बी. सी. केम्पीपाटील,  सहाय्यक संचालक, कुष्ठरोग डॉ. प्रकाश पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाहयसंपर्क) डॉ. हर्षला वेदक, आरोग्य व कुटूंब कल्याण प्रशिक्षण केद्राच्या प्राचार्य डॉ. सुप्रिया देशमुख, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उषादेवी कुंभार, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. देसाई, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनोद मोरे, साथ रोग तज्ञ डॉ. तावशी व सर्व तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
 प्रभावी साथ प्रतिबंधासाठी पूरग्रस्त शिरोळ, हातकणगंले, करवीर, कागल, राधानगरी, चंदगड, पन्हाळा या तालुक्यासाठी जिल्हास्तरीय नोडल अधिकारी व जिल्हास्तरीय पर्यवेक्षक यांची नेमणूक करण्यात आली असून नोडल अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांनी समन्वय ठेवून साथ प्रतिबंधात्मक आरोग्य सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. साथरोग प्रतिबंधासाठी गृहभेटीव्दारे सर्व्हेक्षण, पाणी शुध्दीकरण, उपचार,  अत्यंत महत्वाचे आहेत, यासाठी पूरग्रस्त तालुक्यात  आरोग्य सेवक व आशा यांची प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे.
पूरबाधीत क्षेत्रामध्ये आरोग्य विषयक सेवा देण्यासाठी इतर जिल्हयातील वैद्यकीय अधिकारी यांना जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे मार्फत पूरग्रस्त क्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केद्रांमध्ये नियुक्ती देण्यात येत आहे. तसेच विशेष तज्ञ वैद्यकीय अधिकारी यांना जिल्हा शल्यचिकित्सकांमार्फत ग्रामीण रुग्णालय येथे पूरग्रस्तांसाठी तज्ञ वैद्यकीय सेवा उपब्लध करण्यात येणार आहे. तसेच लातूर जिल्ह्यातील 4 डॉक्टरांची हातकणंगले, अहमदनगर जिल्ह्यातील 8 डॉक्टरांची शिरोळ,  उस्मानाबाद येथील 4 डॉक्टर, नाशिक जिल्ह्यातील 9 डॉक्टरांची करवीर तर सातारा जिल्ह्यातील 4 डॉक्टरांची शिरोळ येथे  नेमणूक करण्यात आली आहे.
            तसेच पूरग्रस्त तालुक्यातील आर.बी.एस.के. पथक तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मागदर्शनाखाली वैद्यकीय सुविधा देणार आहे. नगरपालिका क्षेत्रामध्ये इचलकरंजी, कुरुंदवाड, पेठवडगांव, गडहिंग्लज कागल या ठिकाणी जिल्हा शल्यचिकित्सकांमार्फत पूरग्रस्तासाठी विशेष आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे. पुरेसा औषध साठा उपलब्ध करण्यात आलेला आहे.  तथापि सनियंत्रणासाठी मंडळ स्तरावर मध्यवर्ती औषध भांडारची स्थापना करण्यात आली आहे. त्या मार्फत मागणी, खर्च, पुरवठा इ. सनियंत्रणाचे कामकाज औषध निर्माण अधिकारी पाहतील. पूरग्रस्त भागातील दैनंदिन अहवाल प्राप्त करुन घेणे, अहवाल पृथ:करण करणे, एक‍त्रिकरण, सादरीकरण, इ- मेल करणे ही  कामे जिल्हा एकात्मिक रोग सर्व्हेक्षण कक्षामार्फत करण्यात येणार आहे.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.