कोल्हापूर - 18 (जिमाका) : कापूस पिकांवरील नवीन लष्करी अळींचे व्यवस्थापन करतांना शेतकऱ्यांनी शेतामध्ये
नियमितपणे निरिक्षण आणि देखरेख करुन एकात्मिक कीड व रोग नियंत्रण पध्दतीचा अवलंब करावा,
असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी केले आहे.
कापूस पिकांवरील नवीन लष्करी अळींचे व्यवस्थापन कशाप्रकारे करावे, त्याची काळजी कशा प्रद्धतीने घ्यावी आणि
त्यावर कोणकोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव
वाकुरे यांनी शेतकऱ्यांना सल्ला दिला आहे. यामध्ये कपाशीचा प्रादुर्भावग्रस्त फुले
व हिरवी बोंडे त्वरीत वेचून अळ्यासहीत नष्ट करण्यात यावीत. त्यामुळे अळीचा होणारा प्रसार
रोखण्यात मदत होते. किडीचे वेळेवर व्यवस्थापनासाठी अंडीपुंज असलेली पाने तसेच सुरुवातीच्या
अवस्थेतीत अळ्या हाताने गोळा करुन नष्ट कराव्यात. अंडी अवस्थेतील कीड नियंत्रणासाठी
ट्रायकोग्रामा या परोपजीवी किटकांचे शेतात प्रसारण करावे किंवा कापूस पिकांच्या पानाला
ट्रायकोकार्ड लावण्यात यावे.
नवीन लष्करी
अळीवरील परोपजीवी व परभक्षी किटकांचे संरक्षण आणि संवर्धनासाठी किडीमधील सुरुवातीच्या
अवस्थेत कडुलिंबावर आधारित किटकनाशकांचा वापर करावा. प्रादुर्भाव पिकांचे अवशेष ताबडतोत
नष्ट करण्यात यावे. प्रौढ नर पतंग नियंत्रणासाठी कामगंध सापळ्यांचा वापर करण्यात यावा.
मुख्य शेत तणविरहित ठेवणे आवश्यक आहे. आजूबाजुचे परिसर स्वच्छ ठेवावा. किटकनाशक नोंदणी
समितीने मंजूर केलेल्या शिफारशीप्रमाणे नोंदणीकृत किटकनाशकांचाच वापर करण्यात यावा.
कापूस एकात्मिक किड व्यवस्थापन पद्धती या कृषी विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन
ठेवण्यात आल्या आहेत, त्याप्रमाणे शेतकऱ्यांनी त्याचा अवलंब करावा.
केंद्रीय
कापूस संशोधन केंद्र नागपूर यांनी शिफारस केल्याप्रमाणे कापूस पिकावर मेटा-हायझियम
ॲनिसोप्लि किंवा नोमेरिया रिलाई या किडरोगजनक बुरशींची 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात
मिसळून फवारणी करण्यात यावी. केंद्रीय कापूस संशोधन केंद्र नागपूर या संस्थेने शिफारस केल्याप्रमाणे प्रादुर्भाव कापूस
पिकांचे नुकसान टाळण्याच्या दृष्टीने त्यावर स्पिनेटोरम 11.7 टक्के, एस.पी. 0.8 मि.लि.
किंवा क्लोरॅनट्रानीलीप्रोल 18.5 टक्के, एस.पी. 0.3 मि.लि. किंवा इमामेक्टीन बेन्झोएट
5 टक्के, एस.जी. 0.4 ग्रॅम किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 1.9 टक्के, ई.सी. 1.16 मि.लि.
या किटकनाशकांची प्रती लिटर पाण्यामधून मिसळून
फवारणी करावी.
नवीन लष्करी आळी (फॉल आर्मीवर्म) या किडीचे मका हे
मुख्य खाद्य असले, तरी ते पीक शेतातून काढून टाकल्यास किंवा ते पीक वाढीच्या शेवटच्या
टप्प्यात असल्यास त्याची पसंती कमी होऊन या किडीचा कपाशी बाजरी व इतर पर्यायी पिकांवर
प्रादुर्भाव होण्याचा धोका होतो. ही किड सुमारे 80 पिकांवर उपजिविका करत असतात. खरीपातील
मका पीक काढल्यानंतर ती आजूबाजुच्या इतर पिकांवर स्थलांतरीत होते. यंदाच्या वर्षीचा
पर्जन्यमान विचारात घेता मका पिकाबरोबर इतर रब्बी पिकाखालील क्षेत्रात वाढ होण्याची
दाट शक्यता आहे. शेतकरी बांधूनी सर्तक राहून पिकांवरील किडींचे वेळत व्यवस्थापन करावे.
अधिक माहितीसाठी कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी,
उपविभागीय कृषि अधिकारी या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. वाकुरे यांनी
केले आहे.
0000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.