सोमवार, ४ नोव्हेंबर, २०१९

लष्करीअळी व्यवस्थापनासाठी कृषि विभागाशी संपर्क करण्याचे आवाहन

कोल्हापूर, (जि.मा.का.) दि. 4 : रब्बी हंगामातील मका व ज्वारी पिकांवरील नवीन लष्करीअळी व्यवस्थापनासाठी कृषि विभागाशी संपर्क करा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी केले आहे.
मक्यावरील नवीन लष्करीअळी व्यवस्थापन व देखरेखीसाठी प्रति एकरी 5 कामगंध सापळे उभारून नियमीत पाहणी करावी. ज्या ठिकाणी मक्याचे क्षेत्र जास्त आहे तेथे पीक हंगामात तसेच पीक हंगामानंतरही कामगंधी सापळे उभारून त्यातील किडीच्या पतंगांची नियमीत पाहणी करावी.
महा उगवून येताच सर्वेक्षणास सुरूवात करावी. रोपावस्था ते सुरूवातीची शेंडावस्था (पीक ऊगवणी नंतर 3-4 आठवडे) मध्ये शेंडावस्था ते उशीराची शेंडावस्था (पी ऊगवणी नंतर 5-7 आठवडे) फुलोरा, तुरा, कणीस उगवणे व त्यानंतरची अवस्था. पीक वाढीच्या या अवस्थेत रासायनिक किटकनाशकांची फवारणी करू नये.
 मशागतीय उपाय योजना- उन्हाळ्यात खोल नांगरट करावी, त्यामुळे जमिनीतील किडीच्या अवस्था वर येऊन पक्षी, उन्हामुळे नष्ट  होण्यास मदत होते. पीक पेरणी वेळेवर तसेच एकाच वेळी विस्तृत क्षेत्रावर पेरणी करावी. वेगवेगळृया वेळी पेरणी करू नये, त्यामुळे किडीस सतत खाद्य पुरवठा होऊन किडींचे जीवनचक्र अखंडीत सुरू राहते. पिकांची फेरपालट करावी. सतत एकाच शेतात मका किंवा ज्वरी ही पिके घेऊ नयेत. महा पिकात तुर, उडीद, मुग यासारख्या कडधान्य पिकांची आंतरपीक म्हणून लागवड करावी. पीक वाढीच्या सुरूवातीच्या अवस्थेदरम्यान (पेरणीपासून 1 महिन्यापर्यंत) प्रति एकरी 10 पक्षी थांबे उभारावेत. मका पिकाच्या भोवती सापळा पीक म्हणून नेपियर गवताच्या 3 ते 4 ओळींची लागवड करावी. तसेच सापळा पिकावर अळीचा प्रादुर्भाव दिसून येताच 5 टक्के निंबोळी अर्क किंवा 1500 पीपीएम अझाडीरॅक्टीन 50 मिली प्रतिी 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. शेत स्वच्छ आणि तणमुक्त ठेवावे आणि खतांच्या शिफारशीत मात्रांचा वापर करावा. कणसावर घट्ट आवरण असलेल्या संकरीत वाणांची लागवड केल्याने किडीमुळे कणसाचे नुकसान कमी होईल.
यांत्रिक नियंत्रण पध्दती- किडीचे अंडीपुंज व नवजात समुहातील अळ्या वेचाव्यात व चिरडून टाकाव्यात अथवा रॉकेलमिश्रीत पाण्यात टाकून नष्ट कराव्यात. शेतात अळीचा प्रादुर्भाव दिसून येताच मक्याच्या प्रादुर्भावीत पोंग्यात कोरडी रेती सोडावी. पीक वाढीच्या सुरूवातीच्या तीस दिवसांत रेती+ चुनकळी यांचे 9:1 या प्रमाणात मिश्रण पिकाच्या पोंग्यात सोडावे. मोठ्या प्रमाणावर पतंग  पकडण्यासाठी प्रती एकरी 15 कामगंध सापळे उभारून त्यात अडकलेले पतंग नष्ट करावेत.
जैविक नियंत्रण पध्दती-  महा पिकात कडधान्य, गळीतधान्य आणि शोभिवंत फलझाडांची आंतरपीक म्हणून लागवड करावी, त्यामुळे पीक विविधता वाढून नैसर्गिक शत्रूंचे संरक्षण व संवर्धन होईल. नैसर्गिक शत्रूंचे किटकांचे संवर्धनासाठी अथवा कामगंध सापळ्यात नवीन लष्करी अळीचे प्रती सापळा 3 पतंग सापडल्यास ट्रायकोग्रामा प्रिटीओसम किंवा टेलेनोमस रिमस या परोपजीवी किटकांची प्रती एकर 50 हजार अंडी प्रमाणे एक आठवड्यात अंतराने प्रसारण करावे. रोपावस्था वे सुरूवातीलचे शेंडावस्था (पीक ऊगवणी नंतर 3-4 आठवडे) किडीचा प्रादुर्भाव 5 टक्के असल्यास आणि 10 टक्के कणसांचे नुकसान झाल्यास कीडरोगजनक बुरशी व जीवाणुंचा वापर करावा. मेटा-हायझियम ॲनिसोप्लि, मेटा-हायझिम रिलाई (नोमेरिया रिलाई), बिव्हेरिया बॅसियाना, व्हर्टिसिलीयम लिकॅनी 5 ग्रॅम प्रती लीटर पाण्यातील द्रावण पोंग्यात सोडावे व गरज भासल्यास पुन्हा 10 दिवसानंतर हेच द्रावण पोंग्यात सोडावे. बॅसिलस थुरिनजिनसीस व्ही कुर्सटकी 2 ग्रॅम प्रती लीटर पाणी किंवा 400 ग्रॅम प्रती एकर  याप्रमाणे फवारणी करावी. तसेच एनपीव्ही व कीडरोगजनक सुत्रकृमी यांचा वापर करावा.
रायासनिक नियंत्रण पध्दती- बीज प्रक्रिया- सांयट्रेनिलिप्रोल 19.8 टक्के + थायामेथॉक्झाम 19.8 टक्के एफएस 6 मिली प्रती किलो बियाणे प्रमाणे बीज प्रक्रिया केल्यास किडीच्या नियंत्रणाकरीता 15 ते 20 दिवसांसाठी प्रभावी ठरते. रोपावस्था ते सुरूवातीची शेंडावस्था (पीक ऊगवणी नंतर 3-4 आठवडे) - नवीन लष्करी अळीमुळे 5 टक्के नुकसान असताना नियंत्रणाचे दृष्टिने किडीने घातलेल्या नवीन अंड्यातून अळ्या बाहेर पडू नयेत म्हणून 5 टक्के निंबोळी अर्क किंवा 1500 पीपीएम अझाडीरॅक्टीन 50 मिली 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मध्य शेंडावस्था ते उशीराची शेंडावस्था  (पीक ऊगवणी नंतर 5-7 आठवडे) तुरा येण्याच्या सुरूवातीच्या अवस्थेत अळीमुळे 10 टक्केपेक्षा जास्त नुकसान असताना दुसऱ्या व तिसऱ्या अवस्थेतील अळ्यांच्या नियंत्रणाकरीता स्पिनेटोरम 11.7 टक्के एस.सी. किंवा क्लोरॅनट्रानीलीन प्रोल 18.5 टक्के एस.सी किंवा थायामेथॉक्झाम 12.6 टक्के + लॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5 टक्के झेङ सी. या किटकनाशकाची फवारणी करावी. विष आमिषाचा वापर - 10  किलो भाताचे तूर + 2 किलो गूळ + 2-3 लीटर पाण्याचे मिश्रण 24 तासासाठी आंबवावे व हे आमिष वापरण्याच्या अर्धातास आधी त्यामध्ये 100 ग्रॅम थायोडीकार्ब मिसळून पिकाच्या पोंग्यामध्ये सोडावे. या आमिषाचा वापर पीक वाढीची मध्ये शेंडावस्था ते उशीराची शेंडावस्था तिसऱ्या व त्यापुढील अळी अवस्थेच्या व्यवस्थापनाकरीता करावा. फुलोरा, तुरा, कणीस उगवणे व त्यानंतरची अवस्था (पीक ऊगवणी नंतर 8 आठवडे व त्यापुढे) वाढीच्या या अवस्थेत रासायनिक औषधांव्दारे कीड व्यवस्थापन करणे आर्थिकदृष्ट्या किफायतशीर नसते, नमूद केलेल्या शिफारशीप्रमाणे जैविक किटकनाशकांचा वापर करावा. किडीच्या अळ्या वेचून नष्ट करावयत. औषधांची फवारणी पिकाच्या पोंग्याच्या दिशेने करावी. तसेच सर्व फवारण्या सकाळी लवकर अथवा संध्याकाळी ऊशीरा कराव्यात.
अधिक माहितीसाठी कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, उप विभागीय कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क करा.
            

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.