कोल्हापूर, दि. 31 (जिमाका) : केंद्र
शासनाने पशुसंवर्धनाद्वारे उद्योजकता व कौशल्य विकासावर आधारित नवीन सुधारित
राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेस मंजुरी दिली असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन
विभागामार्फत कळविण्यात आले आहे.
यामध्ये शेळी-मेंढी पालन, कुक्कुट पालन, वराह पालन, पशुखाद्य व
वैरण विकास उपअभियानांतर्गत मुरघास निर्मिती, टीएमआर व फॉडर ब्लॉक निर्मिती तसेच
वैरण बियाणे उत्पादन यासाठी 50 टक्के अनुदान देण्यात येणार आहे. शेळी-मेंढी
पालनाकरिता रुपये 50 लाख, कुक्कुट पालनाकरिता रुपये 25 लाख, वराह पालनाकरिता रुपये
30 लाख आणि पशुखाद्य व वैरण विकास यासाठी रुपये 50 लाख अशी अनुदानाची मर्यादा आहे.
प्रकल्पासाठी स्वहिस्सा व्यतिरिक्त उर्वरित निधी बँकेकडून कर्जाद्वारे उपलब्ध करुन
घ्यायचा आहे.
या योजनेचा लाभ व्यक्तीगत, व्यावसायिक, स्वयं सहाय्यता बचत गट,
शेतकरी उत्पादक संस्था, शेतकरी सहकारी संस्था, कलम 8 अंतर्गत स्थापन झालेल्या
कंपनी, सहकारी दूध उत्पादक संस्था, सह जोखीम गट (जेएलजी), सहकारी संस्था, खासगी
संस्था, स्टार्टअप ग्रुप इत्यादी घेऊ शकतात.
या योजनांच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज
करावयाचा असून, त्यासोबत सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) पॅन कार्ड, आधार कार्ड,
रहिवाशी पुरावा (मतदान ओळखपत्र, वीज देयकाची प्रत), छायाचित्र, बँकेचा रद्द केलेला
चेक इ. अपलोड करणे आवश्यक असून, अनुभवाचे प्रमाणपत्र, वार्षिक लेखामेळ, आयकर
रिटर्न, प्रशिक्षण प्रमाणपत्र, जमिनीचे कागदपत्र, जीएसटी नोंदणी इ. उपलब्ध असल्यास
सादर करावे.
योजनेच्या मार्गदर्शक सूचना वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न
अर्जाचा नमुना इ. पशुसंवर्धन विभागाच्या https://ahd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर व केंद्र शासनाच्या https://www.nlm.udyamimitra.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत, इच्छुकांनी या योजनेचा लाभ घ्यावा,
असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्तांनी केले आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.