सोमवार, १५ जुलै, २०१९

वृक्ष लागवडीत प्रत्येकाने सहभागी व्हा - पालकमंत्री चंद्रकांत पाटील







            कोल्हापूर, दि. 15 (जिमाका) : 33 कोटी वृक्ष लागवडी अंतर्गत जिल्ह्यामध्ये वृक्ष लागवड करणं हे एक मोठं आव्हान आहे. यामध्ये प्रत्येकाने आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
       येथील वन विश्रामगृह व वन्यजीव रेस्क्यू व्हॅनचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती उपस्थित होते.  यावेळी महापौर माधवी गवंडी, उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. योगेश जाधव, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, अप्पर प्रधान मुख्य वन संरक्षक डॉ. दिनेशकुमार त्‌यागी, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिकेचे आयुक्त मल्लिनाथ कल्लशेट्टी आदी उपस्थित होते.
            पालकमंत्री श्री. पाटील पुढे म्हणाले, गेल्या 70 वर्षात जिल्ह्यामध्ये पाण्याचे नियोजन करावं लागलं नाही याचे मुख्य कारण म्हणजे जिल्ह्यामध्ये असणारे जंगल. या जंगलाबरोबरच वन्य प्राण्यांचे अस्तित्वही जिल्ह्यामध्ये आहे. राज्यामध्ये एकीकडे कृत्रिम पाऊस पाडण्याचा विचार सुरु असताना आपल्या जिल्ह्यातील धरणे 53 टक्के भरली आहेत, याचे प्रमुख कारण म्हणजे वृक्ष लागवड.
            33 कोटी वृक्ष लागवड अंतर्गत वन विभागाने वृक्ष लागवडीची मोठी मोहीम हाती घेतली आहे. वृक्ष लागवडीचे हे आव्हान मोठे असून आपल्या सर्वांना त्यामधील वाटा उचलावा लागणार आहे. जंगलामध्ये असणाऱ्या हिंस्त्र प्राण्याविषयी ममत्व भाव ठेवून पुन्हा जंगलात सोडून देण्यासाठी वन खात्याच्या आज तीन रेस्क्यू व्हॅनची सोय झाली आहे.  या व्हॅनमध्ये पिंजरा आहे, नवीन प्रकारची बंदूक आणि जखमींना आणण्याची सोय देखील यात केली आहे. वन खात्याने स्वतंत्र विश्रामगृह उभारुन वन विभागाच्या अधिकाऱ्यांसाठी चांगली सोय केली आहे, असेही ते शेवटी म्हणाले.
            प्रधान सचिव श्री. खारगे यावेळी म्हणाले, राज्यात 1 जुलैपासून साडे आठ कोटी वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्हा सर्वात आघाडीवर आहे. वृक्ष लागवडीचे काम प्रभावी आणि पारदर्शीपणाने होत आहे. वृक्ष लावगडीची माहिती अक्षांश आणि रेखांशासह संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली आहे. लागवड झालेल्या वृक्षाला जीवंत ठेवण्याची जबाबदारी ही लावगड करणाऱ्या संस्थेची, व्यक्तीची आहे, असेही ते म्हणाले.
            साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त सलीम मुल्ला यांच्या ऋतूफेरा या पुस्तकाचं.  सामाजिक वनीकरणाच्या जैव विविधतेबाबत ध्वनीचित्र फितीचे आणि पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.  शहर आत्महत्या कारायचं म्हणतयं या कविता संग्रहाचे कवी सुशीलकुमार शिंदे, सलीम मुल्ला, विश्वास पाटील, हणमंत कोळगे, माधवी जाधव, दत्तात्रय पाटील आदी वनरक्षकांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
            कार्यक्रमाची सुरुवात वृक्ष पुजनाने झाली. स्वागत प्रास्ताविक उप वनसंरक्षक हणमंत धुमाळ यांनी केले तर वन परिक्षेत्र अधिकारी सुधीर सोनवले यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमात मुख्य वनसंरक्षक डॉ. व्ही. क्लेमेंट बेन,  वन्यजीव वन संरक्षक सत्यजीत गुजर आदीसह वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



1926 हॅलो फॉरेस्ट
        मानवी वस्तीमध्ये आलेल्या वन्य प्राण्यास जीवदान देण्यासाठी वन विभागामार्फत  1926 हा टोल फ्री क्रमांक सुरु करण्यात आला  आहे. या क्रमांकावर संपर्क साधल्यास वन विभागाची रेस्क्यू व्हॅन उपलब्ध होणार आहे. मानवी वस्तीमध्ये आलेल्या वन्यजीवाला पकडून त्याला पुन्हा जंगलात सोडले जाईल. ही सेवा 24 तास उपलब्ध आहे.
0 0 0 0 0 0 0 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.