इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

रविवार, १ मार्च, २०२०

केवळ महिनाभरात शहरासाठी 47 कोटी 50 लाखाचा निधी शहर विकासासाठी पुढेही निधी कमी पडू देणार नाही - पालकमंत्री सतेज पाटील








कोल्हापूर, दि. 1 (जि.मा.का.) : करवीर काशीचा विकास होण्याच्या दृष्टीने महिनाभरात 22 कोटी 50 लाखाचा जिल्हा नियोजनमधून तर 25 कोटी ठोक अनुदान म्हणून वित्त मंत्र्यांनी दिला आहे. यापुढेही शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी दिली.
 श्री क्षेत्र महालक्ष्मी (करवीर निवासिनी अंबाबाई) मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत बहुमजली वाहनतळ इमारत बांधण्याचा भूमिपूजन सोहळा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते आज झाला. यावेळी महापौर निलोफर आजरेकर उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. योगेश जाधव, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, आमदार चंद्रकांत जाधव, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, उप महापौर संजय मोहिते आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. पाटील पुढे म्हणाले,  तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील पहिल्या टप्याची सुरुवात आजच्या भूमिपूजन सोहळ्याने होत आहे. या बहुमजली वाहनतळामुळे शहरात येणाऱ्या भाविकांसाठी, पर्यटकांसाठी मोठी सोय होणार आहे. पहिला टप्पा म्हणून निधी दिला असला तरी उर्वरित राहिलेलं काम ही आम्हीच करणार आहोत त्यासाठीही निधी देण्याची आमची भुमिका राहील. नगरोत्थान मधून सिग्लनसाठी दीड कोटी, बल्ड सेपरेशन युनिटसाठी दीड कोटी, दलित वस्ती प्रभागासाठी आकरा कोटी, पुरग्रस्तांसाठी तीन कोटी असा जिल्हा नियोजनमधून 22 कोटी 50 लाखाचा निधी दिला आहे. वित्तमंत्री अजित पवार यांनीही ठोक अनुदान म्हणून 25 कोटीचा निधी महापालिकेला दिला आहे. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. शहराच्या विकासाला निधी कमी पडणार नाही त्यासाठी आम्ही प्रयत्नशिल राहू. मात्र तुम्हा सर्वांची साथ विकास कामाला हवी, असेही ते म्हणाले.
ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ यावेळी म्हणाले, बहुमजली वाहनतळामुळे मोठा प्रश्न निकालात निघणार आहे. किमान 500 वाहनांची सोय या ठिकाणी व्हावी. आपल्या विभागाचा विकास झाला पाहिजे. त्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशिल आहोत.  शहरातील रस्त्यांसाठी 178 कोटीचा रस्ते बांधणीच्या प्रकल्पास लवकरच मंजुरी दिली जाईल. विकासाभिमुख शहर करु. दर्जेदार कामं होणं ही लोकांची अपेक्षा आहे. चांगली विकासात्मक कामं करा, दर्शन मंडपाचा मार्गही मोकळा करु, असे आश्वासन ही त्यांनी दिले.
यावेळी  पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष श्री. जाधव, उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. जाधव, आमदार श्री. जाधव यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सुरुवातीला महापौर श्रीमती आजरेकर यांनी सर्वांचे स्वागत करुन प्रास्ताविक केले.
 यावेळी स्थायी समितीचे सभापती संदीप कवाळे,  प्राथमिक शिक्षण समिती सभापती श्रावण फडतारे, परिवहन समिती सभापती  प्रतिज्ञा उत्तुरे, विरोधी पक्षनेता विजय सूर्यवंशी, प्रभाग समिती सभापती.हसिना फरास, गटनेता शारगंधर देशमुख, अजित ठाणेकर, राहुल चव्हाण, स्थानिक नगरसेवक शेखर कुसाळे, अशोक जाधव, प्रतापसिंह जाधव, अर्जुन माने, तौफिक मुल्लानी, सुभाष बुचडे, सचिन पाटील, नियाज खान, लाला भोसले, आशिष ढवळे, नगरसेविका .माधुरी लाड, वहिदा सौदागर, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, उप-शहर अभियंता रावसाहेब चव्हाण, इस्टेट ऑफिसर सचिन जाधव, कनिष्ठ अभियंता अरुण गवळी, ठेकेदार व्ही.के.पाटील व नागरिक आदी उपस्थित होते.
000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.